सुचलं म्हणून...

आज बर्‍याच दिवसांनी थोडा निवांत मिळाला. Computer चालु केला आणि ब्लॉगस्पॉट वर पाहिल तर माझी शेवटची पोस्ट April 2, 2009 ला लिहिली होती. बापरे म्हणजे इतके दिवस मी काहीच लिहीलेल नाही. हेही आहेच म्हणा मागचे काही दिवस मी जरा जास्तच बिझी आहे त्यामुळे कशाला वेळच मिळत नाही(सबब)..मला माहित आहे वेळ मिळत नसतो तर तो काढावा लागतो पण काय करणार.

पण दुसरा मोठा प्रॉब्लेम हा असतो कि जेव्हा आपण काही लिहायला बसतो तेव्हा सुचत नाही. आता ह्या सुचण्याची पण गंमतच असते, अहो तुम्हाला कधीही कुठेही काहीही सुचू शकतं. माझ्या मते हा माझाच नाही तर तुमचाही अनुभव असेन. म्हणजे बघा भरगच्च लोकल मध्ये दुसर्‍याच्या अंगावर रेलून जेव्हा तुम्ही डोंबिवली ते दादर प्रवास करत असतात तेव्हा जर तुम्हाला काही सुचल तर सांगा काय करायचं. आहेना विचार करण्यासारखी बाब. मग मनात खूप ठरवलं जातं कि उतरल्यावर नक्की लिहून काढू पण जेव्हा त्या गर्दीबरोबर उतरतो तेव्हा सगळ विसरलेलो असतो कारण पुढच्या दिवसाच टेंन्शन सुरु झालेल असतं.

अजून दुसरी जागा जिथे तुम्हाला हमखास काही तरी सुचू शकत ती म्हणजे ऑफिसमधल्या त्या बोरिंग मिटींग्स. समोरचा ती व्यक्ती विषयाला सोडुन भरपूर पकवत असते आणि तुम्ही तेव्हा एकतर जांभयातरी तरी देत असतात किंवा विचार करत असतात. मला तर अशावेळी बरच काही सुचत असतं पण काय करणार लिहू शकत नाही आणि बाहेर आल्यावर बॅक टु वर्क...मग दिवस तसाच संपतो. रात्री झोपताना पण पुष्कळवेळा सुचत पण लिहायचा कंटाळा आलेला असतो.

पण जेव्हा तुम्हाला काही सुचत असतं आणि तुम्ही लिहायला बसतात तो क्षण अगदी अप्रतिम असतो. म्हणजे मनातून विचार एखाद्या नदीप्रमाणे वाहत असतात आणि अशावेळी तो लिहिण्याचा स्पीड पण खूप कमी पडायला लागतो. तरी पण ती मजा काही औरच असते. आता मी ठरवलं आहे कि जेव्हा सुचतं तेव्हा शक्यतो लिहायचचं, संपूर्ण नाही तर कमीतकमी पॉईंट्समध्ये तरी लिहायचं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा