पांढर्‍याची वाडी - भाग १

मुख्य रस्ता सोडून बस तांबडी फाट्यावरून कच्चा रस्त्याला लागली. आता बसचा पुढचा प्रवास हा असाच कच्चा रस्त्यावरून होणार होता. आपल्या राजकारण्यांनी कितीही शहरीकरणाचे सूर आळवले तरी कोकणातल्या दुर्गम भागातले रस्ते आजुनहि कच्चेच आहेत. बसला बसणार्‍या धक्क्यामुळे असेल कदाचित शिवाला अचानक जाग आली, डोळे किलकिले करत त्यानं खिडकीतून बाहेर पाहिल. बाहेर नुकतच उजाडल होत, आजुनहि व्यवस्थित प्रकाश पडला नव्हता. त्या छोट्याशा रस्त्यातून बस धुळ उडवत जात होती, हे सगळ दृष्य पाहुन शिवान ओळखल कि बसने तांबडी फाटा ओलांडला आहे. म्हणजे अजुन दोन तास तरी लागतील माणगाव यायला. शिवान बसमध्ये आजूबाजूला पाहिल काहि लोक झोपेतून उठले होते तर काहि अजुनहि पेंगतच.होते. हवेत मस्त सकाळचा गारवा पसरला होता. शिवा परत खिडकीतून त्याच्या लाडक्या कोकणच रमणीय दृष्य पाहु लागला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाडींमधली उंचच उंच नारळ, सुपारीची झाड जणु आकाशाला गवसणीच घालत होती. गुराखी तोंडानं आवाज करत आणि हातात काठि घेत गुरांना हाकत होते. बायका, मुली हंडे डोक्यावर घेउन विहिरीच्या दिशेने जात होत्या. बर्‍याच दिवसांनी हे सगळ पाहुन शिवाला खूप छान वाटल तो मोठ्या उत्साहानं बाहेरची ती मजा पाहु लागला. गेले पाच वर्ष शिक्षणाच्या निमित्ताने तो पुण्यात रहात होता. लहानपणीच आईबापांना पारखा झालेल्या शिवाला त्याच्या आजोबा आणि आजीनेच वाढवल होतं. माणगावात शिवाचे आजोबा म्हणजे आण्णा यांच्या मोठ्या आंबा आणि फणसाच्या बागा होत्या त्यामुळे घरची परीस्थिती चांगलीच होती. आण्णा जातीन आपल्या बागांमध्ये लक्ष देत असत. शिवाच बालपण अण्णांच्या शिस्तीत गेलं होत. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या शिवाच चवथीपर्यंतच शिक्षण माणगावातच झाले. पुढच्या शिक्षणाकरता शिवा जवळच असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जात असे. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या शिवाला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता अण्णानी पुण्याला पाठवल, तेव्हापासून शिवाचा माणगवशी संपर्क खूपच कमी झाले. पहिली काहि वर्ष शिवा महिने दोन महिन्यातून गावी येत असे पण पुढे हे कमी होत गेलं, आणि ह्यावेळेस तर तो तब्बल दोन वर्षानी गावी येत होता. ह्यावेळेस मात्र शिवा चांगल्या मोठ्या मुक्कामाला आला होता. त्यानं नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि आता निकाला लागायला मधे दोन महिन्यांचा तरी आवधी होता.

कंडक्टरनी "माणगाव" असं म्हणत बेल मारली, तसा शिवा तंद्रीतून बाहेर आला त्यानं झटकन आपली बॅग उचलली आणि खाली उतरला, बस झपकन धुळ उडवत निघून गेली. त्यान इकडे तिकडे बघत मस्तपैकी आळस दिला. मग अण्णाच्या वाडीची वाट चालु लागला. माणगाव तसं छोटसच होत त्यामुळे तिथे घरी पोहोचण्याकरता वाहन असं काहिच नव्हत. तो त्या सुंदर सकाळची मजा लुटत चालायला लागला, तेवढ्यात त्याला लांबून ओळखीची हाक ऐकु आली, त्यान मागे वळून पाहिल तर त्याचा बालमित्र चिंत्या आपल्या बैलगाडीत बसून त्याच्याच दिशेने येत होता. जशी बैलगाडी शिवाच्या जवळ आली चिंत्यान खाली उडी मारली आणि शिवाच्या जवळ येत म्हणाला.
"अरे शिवा तू कधी आलास?"
"हा काय आताच येतोय."
"अरे तू तर एकदम हिरो झालास रे, जीनची पॅन्ट, हा रंगीत शर्ट... वा वा."
"सोड रे झाल का तुझे परत सुरु? तू बोल कसा आहेस? आणि घरचे सगळे कसे आहेत?" 
"अरे हो.. हो.. जरा दमान घे. मी एकदम बेश्ट, आनी मी बेश्ट म्हंजी घरचे बी बेश्टच कि"
मग थोडं गंभीर होत चिंत्या म्हणाला.
"पण म्हातार्‍यानं अंथरुण धरल बघ आता. जाऊ दे ते सारं... चल मी तुला घरी सोडतो."
"अरे नको कशाला. तुला शेतावर जायला उशीर होईन. मी जातो आपला चालत माझा."
"शेत म्हनजे काय हापिस हाये व्हय? चल बस चटकन"
त्यानं शिवाची बॅग बैलगाडीत ठेवली मग शिवा चिंत्याच्या बाजुला बसला चिंत्यान बैलगाडी हाकली, गप्पाच्या नादात आण्णाची वाडि कधी आली ते त्यांना कळलच नाहि. शिवाला लांबूनच त्याची ती लाडकि वाडि दिसली, चोहोबाजूंनी नारळ, सुपारी, आणि आंब्याची झाडं आणि मध्ये टुमदार घर. शिवाची वाट पहात आण्णा माडीवर येरझाऱ्या घालत होते. साधारण पंचाहतरीतले आण्णा अजुनहि खूप उत्साहि होते. डोक्यावरचे केस आणि ओठावरची जाड मीशी जरी पिकली असली तरी त्यांचा उत्साह मात्र एखाद्या तरूणाला लाजवेल असाच होता. शिवाला येताना पाहुन ते लगबगीनं खाली उतरले. शिवान अण्णांना वाकून नमस्कार केला तसं अण्णानी आशीर्वाद देत त्याला उठवल. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मग शिवाला घरात नेत त्यांनी माईंना हाक मारली.
"आहो ऐकलत का? शिवा आलाय."
तसं माई म्हणजे शिवाची आजी लगबगीनं बाहेर आल्या. माई म्हणजे मूर्तीमंत मायेचं प्रतिक. वयाची सत्तरी ओलांडली तरी तिच्या चेहर्‍यावरच ते तेज अगदी तसंच होत. नऊवारी जरीच्या काठाची हिरवी साडी, कपाळावर मोठे कुंकू आणि डोळ्यावर चष्मा.
"अगं बाई आला का शिवा."
शिवान माईंना वाकून नमस्कार केला, तसं त्याला आशीर्वाद देत माईंनी शिवाच्या खांद्याला हात लावत उठवल. मग पदरानं आपले डोळे पुसत त्या म्हणाल्या.
"किती वाळलय गं माझ लेकरू. पुण्याला काहि खातो पितो कि नाहि रे."
"माई आता आलोय ना इथे. तुझ्या हातच खाऊन चांगला जाड जुड होऊनच जाईन."
"हट्ट शिंच्या आल्या आल्या जायच्या कसल्या गप्पा करतोस.. "
.मग वातावरणाला थोडं हलकंफुलकं करण्याकरता चिंत्या म्हणाला.
"आण्णा पाहिल का आपला शिवा कसा एकदम हिरोवानी दिसतो ते."
अण्णांनी पण चिंत्याच्या हो मध्ये हो मिळवून हसून दाखवल तस माई म्हणाल्या.
"चला आत चला. शिवा तु हात पाय धुवून घे. देवाला नमस्कार कर तोवर मी चहा आणते. चल रे चिंत्या तु पण चल".
"नाय म्या जातो आता शेतावर"
"बरं रात्री जेवायला इथेच ये भरली वांगी करणारा आहे."
"व्हय नक्किच" असं म्हणत चिंत्या निघून गेला.
पुढचा सगळा दिवस प्रवासाचा क्षीण घालवण्यात गेला, त्यान आण्णा आणि माईंशी भरपूर गप्पा मारल्या. रात्री चिंत्यापण जेवायला आला होता. माईंच्या हातच सुग्रास जेवण जेवून दोघा दोस्तांनी भरपूर गप्पा मारल्या. पुढचे दोन तीन दिवस शिवाचे असेच मजेत गेले.

रवीवारी सकाळी शिवा आणि आण्णा वाडितल्या ओसरीवर गप्पा मारत बसले होते तेवढ्यात त्यांच्या वाडित काम करणारा सदा धावतच आण्णांकडे आला. त्याचा चेहरा गंभीर वाटत होता. आण्णांनी त्याला विचारल.
"काय रे सदा काया झाल? असा का दिसतोयस तू?"
"आण्णा येक वाईट बातमी हाये. चिंत्याच्या म्हातार्‍यान जीव सोडला"
"अरे देवा... कधी रे"
"आताच कि थोड्या वेळापूर्वी."
शिवाकडे पहात आण्णा म्हणाले.
"चल शिवा आपल्याला जायला पाहिजे. आत जा आणि माईला घेउन ये लवकर"
तसा शिवा आत गेला, थोड्याच वेळात तिघेहि चींत्याच्या घरी रवाना झाले.

पुढील भाग लवकरच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रिया नोंदवा